Monday, March 5, 2012

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं

प्रत्येकाच्या मनात एक छोटंसं गाव असतं
ते किती सुंदर आहे हे ज्याचं त्यालाच ठाव असतं

तांबडी लाल माती नि हिरवी गार शेतं
कौलारू घरांची शाकारलेली छतं

कुठल्याश्या घरातून एक म्हातारी बोलावते
ओळखीचे कोणी नाही, हे पाहून तिची पापणी ओलावते

"कोणाची गं पोर तू? ये आत ये", म्हणते
वाकून भाकरी वाढताना जराशी कण्हते

तिच्या हातची चटणी- भाकरी लागते इतकी गोड
कारण त्यात असते माया नि आपुलकीची ओढ

भाकर खाताना माय पाठीवरून हात फिरवते
टचकन डोळ्यांत पाणी येतं नि आईची आठवण येते

बाहेर खाटल्यावर असतो एक म्हातारा
चीपटं- मापटं शरीर नि डोळ्यांपुढे अंधार सारा

जायची वेळ आल्यावर पाय निघता निघत नाही
आपण वळून पाहिलं नाही, तरी गाव पाहत राही

गाव सोडलं तरी मन गावीच राहतं
त्याच्या डोळ्यांनी ते सारं गाव पाहतं

प्रत्येकालाच गावी राहिलेले दिवस परत यावेसे वाटतात
गावची नुसती आठवण झाली तरी डोळ्यांत अश्रू दाटतात

No comments:

Post a Comment